“एक दिवस कवितेचा...” |
इयत्ता पहिलीपासून पुढे मुलांना यमक जुळणाऱ्या शब्दांची कल्पना आलेली असते. यमक जुळवून मुलं छोट्या छोट्या कविताही करतात. कविता म्हणजे काय, ओळी कशा असतात याचीही जाणीव हळूहळू वाढत जाते.
सातवीच्या टप्प्यावर तर ‘यमक’ चांगलंच लक्षात आलेलं असतं. पण असंही लक्षात येतं की यमक जुळविण्याच्या नादात कवितेचा मूळ विषय, मूळ विचार बाजूला राहतो आणि कविता थोडी भरकटल्यासारखी वाटते.
मग एक दिवस त्याबद्दल मुलांशी मी चर्चा केली व मुलांना कोणताही एक विचार, विषय घेऊन त्या विषयाची खोली कुठपर्यंत जाऊ शकते असे मुद्दे काढायला सांगितले. हे मुद्दे घेऊन आम्ही एक दिवस शाळेजवळच्या माळजाई मंदिर परिसरात कविता करण्यासाठी गेलो. सकाळी ११.३० ते १.३० ही कविता लिहण्याची वेळ ठरली प्रत्येकजण आपल्या विषयावर, विचारांवर नव्याने विचार करायला लागला. काही जणांना नेमका काय विचार करायचा. त्यात कवितेच्या ओळी कशा गुंफायच्या याचा संभ्रम पडला. पण काहीजणांना ही संकल्पना एवढी लक्षात आली की काढलेल्या मुदयांवर त्यांना खुप सुरेख अशा कविता तयार केल्या. काहींना थोडं मार्गदर्शन करावं लागलं. पण “कवितेसाठीचा, काव्यप्रतिभेसाठीचा एक दिवस” खरंच सत्कारणी लागला. माळजाईच्या निसर्गरम्य व शांत वातावरणात मुलांना सुंदर कविता स्फुरल्या.
अनिता कुलकर्णी, शिक्षिका |