खेळ |
अकरा वाजले, चला आता आपण आपला वर्ग आवरूया, असे ताईनी सांगितल्यावर मुलांनी पटापट साहित्य आवरलं, कपाटात ठेवण्यासाठी ताईनजवळ आणून दिलं. वर्ग आता आवरून झाला होता, वेळ होती ती गाणी, गोष्टी सांगायची. ताईनी तशी मुलांना सूचना दिली. “चला आपण गोलात बसुया आणि आणि गाणी म्हणूया.” सूचना देत-देतच ताईना एका कोपऱ्यात चार मुली टाळ्यांचा खेळ खेळताना दिसल्या, ते गाणं होत , “टाळ्या बाई टाळ्या, पुरणाच्या पोळ्या.” या गाण्यावर त्या मुलींनी चांगलाच टाळ्यांचा ठेका धरला होता. ताई थोडा वेळ स्तब्धच उभ्या राहिल्या. त्या मुलींकडे बघून त्या वर्गात आहेत, हे काही क्षणांसाठी त्या विसरून गेल्या, जणू काही स्वतःच्या बालपणात हरवून गेल्या होत्या त्या. मग काय ताईनाही त्या मुलांसोबत टाळ्या खेळाव्याशा वाटल्या. मग सर्व वर्गाने चार-चार मुलामुलींचे गट केले व टाळ्यांचा गजर वर्गात दणाणू लागला. कुणी म्हणत होते “पेपर, सीझर....”, कुणी “आंबा पिकतो.....” कुणी “पिझ्झा-पिझ्झा...” टाळ्यांचा गजर वर्गात दुमदुमत होता. शाळा केव्हा सुटली कुणाच्या लक्षातच नाही आले.
प्रियदर्शनी सावंत, शिक्षिका |